उंबरठ्यासह ओलांडुनिया मातेची माया
नको रे जाउं रामराया
शतनवसांनीं येउन पोटीं
सुखविलेंस का दुःखासाठीं ?
प्राण मागतो निरोप, रडते कासाविस काया
कशी मूढ ती सवत कैकयी
तीही मजसम अबला, आई
आज्ञा देइल का भरता ती कांतारीं जाया ?
तृप्त होउं दे तिचीं लोचनें
भरत भोगुं दे राज्य सुखानें
वनीं धाडिते तुजसि कशास्तव वैरिण ती वाया ?
सांगुं नये तें आज सांगतें
मजहुन ह्यांना ती आवडते
आजवरी मी कुणां न कथिल्या मूक यातना या
तिच्या नयनिंच्या अंगारांनीं
जळतच जगलें मुला, जीवनीं
तुझिया राज्यीं इच्छित होतें अंतिं तरी छाया
अधर्म सांगूं कसा बालका
तुष्ट ठेव तूं तुझिया जनका
माग अनुज्ञा मात्र जननितें कांतारीं न्याया
तुझ्यावांचुनी राहुं कशी मी ?
वियोग रामा, सांहु कशी मी ?
जमदग्नीसम तात तुझें कां कथिति न माराया
तुझ्या करें दे मरणच मजसी
हो राजा वा हो वनवासी
देहावांचुन फिरेन मग मी मागोवा घ्याया
गदिमा गौरव | Special Quotes
पं.महादेवशास्त्री जोशी
गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे
संयुक्तिक ठरेल..