गदिमा नवनित
  • "नच स्वीकारा धना कांचना,नको दान रे, नको दक्षिणा
    काय धनाचें मूल्य मुनिजनां ? अवघ्या आशा श्रीरामार्पण"
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (आकाशवाणी,संगीत:सुधीर फडके | Geetramayan (Akashwani)
  • आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.

    आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अ‍ॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.

    गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
  • Box-C-19
  • पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
    Paradhin Aahe Jagti Putra Manavacha

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (आकाशवाणी)      Album: GeetRamayan (Akashwani)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
    पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

    माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
    राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
    खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

    अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगात
    सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
    वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा

    जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
    दिसे भासते तें सारें विश्व नाशवंत
    काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ?

    तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
    अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
    मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा

    जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
    दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?
    वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा

    दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
    एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
    क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

    नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
    तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
    अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा

    नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
    पितृवचन पाळून दोघे हो‍उं रे कृतार्थ
    मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा

    संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
    अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
    तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा

    पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
    प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
    मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.भा.भावे
    'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs