सांवळा ग रामचंद्र
माझ्या मांडीवर न्हातो
अष्टगंधांचा सुवास
निळ्या कमळांना येतो
सांवळा ग रामचंद्र
माझ्या हातांनीं जेवतो
उरलेल्या घासांसाठीं
थवा राघूंचा थांबतो
सांवळा ग रामचंद्र
रत्नमंचकीं झोंपतो
त्याला पाहतां लाजून
चंद्र आभाळीं लोपतो
सांवळा ग रामचंद्र
चार भावात खेळतो
हीरकांच्या मेळाव्यांत
नीलमणी उजळतो
सांवळा ग रामचंद्र
करी भावंडांसी प्रीत
थोरथोरांनी शिकावी
बाळाची या बाळरीत
सांवळा ग रामचंद्र
त्याचे अनुज हे तीन
माझ्या भाग्याच्या श्लोकाचे
चार अखंड चरण
सांवळा ग रामचंद्र
करी बोबडे भाषण
त्याशी करितां संवाद
झालों बोबडे आपण
सांवळा ग रामचंद्र
करी बोबडे हें घर
वेद म्हणतां विप्रांचे
येती बोबडे उच्चार
सांवळा ग रामचंद्र
चंद्र नभींचा मागतो
रात जागवितो बाई
सारा प्रासाद जागतो
सांवळा ग रामचंद्र
उद्यां होईल तरुण
मग पुरता वर्षेल
देवकृपेचा वरुण
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.