मुद्रिका अचुक मी ओळखिली ही त्यांची
मज सांग अवस्था दूता, रघुनाथांची
हातांत धनू तें, अक्षय भाता पृष्ठीं
विरहांत काय ते राघव झाले कष्टी ?
कां श्यामल वलयें नयनतळीं चिंतांचीं ?
बसलेत काय ते लावुन कर कर्मातें ?
विसरलेत काय ते
दुःखें निजधर्मातें ?
करितात अजुन ना कर्तव्यें नृपतीचीं ?
सोडिले नाहिं ना अजुन तयांनीं धीरा ?
का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा ?
साह्यार्थ असति ना सैन्यें सन्मित्रांची ?
इच्छिती विजय ना त्यांचा अवघे राजे ?
का लोकप्रीतिला मुकले प्रियकर माझे ?
विसरले थोरवी काय प्रभू यत्नांची ?
का मलाच विसरुन गेले माझे स्वामी ?
मी दैवगतीने पिचतां परक्या धामीं
का स्मृती तयांना छळिते या सीतेची ?
करतील स्वयें ना नाथ मुक्तता माझी ?
धाडील भरत ना सैन्य, पदाती, वाजी ?
कळतसे त्यांस का वार्ता रघुनगरीची ?
का विपत्कालिं ये मोह तयांच्या चित्तीं ?
पुसटली नाहिं ना सीतेवरची प्रीती ?
करतील मुक्तता कधिं ते वैदेहीची ?
त्या स्वर्णघडीची होइन का मी साक्षी ?
कधिं रामबाण का घुसेल रावणवक्षीं ?
वळतील पाउलें कधीं इथें नाथांचीं ?
जोंवरी तयांचें कुशल ऐकतें कानीं
तोंवरी सजिव मी असेन तैशा स्थानीं
जन्मांत कधीं का होइल भेट तयांची ?
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....