मैना राणी चतुर शहाणी
सांगे गोड कहाणी
कहाणीत त्या पशुपक्षांना
अवगत असते वाणी.....
सिह वनाचा असतो राजा
घेती त्याची चिठ्ठी
वाघ वागतो भिऊन त्याला
गुडघे टेकी हत्ती
अती चतुर कोल्हा कोणी
सिहा पाजी पाणी
सांगे गोड कहाणी......
मैना राणी
कोल्ह्याचाही काढे काटा
कोणी करकोचा
घरी बोलावून पाणउतारा
करी पाहुण्याचा
कडी वरी त्या कडी करूनिया
टोला कोल्हा हाणी
सांगे गोड कहाणी......
शाल म्हणुनी खाल पांघरे
गाढव वाघाची
त्यास पाहता झोप उडाली
जंगल भागाची
एक कोंबडा उघडकीस पण
ढोंगच त्याचे आणी
सांगे गोड कहाणी.....
गदिमा गौरव | Special Quotes
पं.महादेवशास्त्री जोशी
गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे
संयुक्तिक ठरेल..