आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.
आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.
गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
मेघगर्जनेपरी, काननांत हो ध्वनी
धांवतात श्वापदें, भक्ष्यभाग टाकुनी
कोंकतात भेंकरें, कंपितांग थांबुनी
धूळ ही नभीं उडे, सैन्य येतसे कुणी
खूण ना दिसो कुणा, दीप्त अग्नि शांतवा
उत्तरेस तो थवा, काय तर्क बांधुनी ?
पाहतोंच काय तें, तालवृक्षिं जाउनी
कोण येइ चालुनी, निर्मनुष्य ह्या वनीं
सिद्ध राहूं द्या तळीं, चाप रज्जू ओढुनी
पाहुं वीर कोण तो, दावि शौर्य-वैभवा
कैक पायिं धांवती, हस्ति अश्व दौडती
धर्मस्नात सारथी, आंत ते महारथी
कोण श्रेष्ठ एक तो, राहिला उभा रथीं
सांवळी तुम्हांपरी, दीर्घबाहु आकृती
बंधु युद्धकाम का, शोधुं येइ बांधवा ?
भ्याड भरत काय हा बंधुघात साधतो
येउं दे पुढे जरा, कंठनाल छेदतों
कैकयीस पाहूं दे, छिन्न पुत्रदेह तो
घोडदौड वाजते, ये समीप नाद तो
ये पुनश्च आज ही, संधी शस्त्रपाटवा
एक मी उभा इथें, येउं देत लाख ते
लोकपाल तो नवा, स्वत्वहीन लोक ते
क्षम्य ना रणांगणीं, पोरकेंहि पोर तें
शत्रुनाश क्षत्रियां, धर्मकार्य थोर तें
ये समोर त्यास मी, धाडितोंच रौरवा
नावरेच क्रोध हा बोधिल्या अनेकदा
राम काय जन्मला सोसण्यास आपदा
होउं देच मेदिनी पापमुक्त एकदा
भरतखंड भोगुं दे रामराज्य संपदा
धर्मरक्षणी-क्षणीं, मी अजिंक्य वासवां
गदिमा गौरव | Special Quotes
लेखक पु.भा.भावे:
वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.