आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.
आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.
गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
MP3 player is mobile compatible (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
शेवटीं करितां नम्र प्रणाम
बोलले इतुके मज श्रीराम-
"अयोध्येस तूं परत सुमंता
कुशल आमुचें कथुनी तांतां
पदवंदन करि माझ्याकरिंता
तातचरण ते वंदनीय रे, शततीर्थांचें धाम"
"अंतःपुरिं त्या दोघी माता
अतीव दुःखी असतिल सूता
धीर देई त्या धरुनी शांतता
सौख्य आमुचे सांगुन त्यांच्या शोका देई विराम"
"सांग माउली कौसल्येसी
सुखांत सीता सुत वनवासी
पूजित जा तूं नित् अग्निशीं
तुझिया श्रवणीं सदा असावा मुनिवरघोषित साम"
"वडिलपणाची जाणिव सोडुनि
सवतींशीं करि वर्तन जननी
मग्न पतीच्या रहा पूजनीं
तव हृदयाविन त्या जिवासी अन्य नसे विश्राम"
"राजधर्म तूं आठव आई
अभिषिक्तातें गुण वय नाहीं
दे भरतासी मान प्रत्यहीं
पढव सुमंता, विनयाने हें, सांगुन माझे नाम"
"सांग जाउनी कुमार भरता
हो युवराजा, स्वीकर सत्ता
प्रजाजनांवर ठेवी ममता
भोग सुखाचा अखंड घेई, मनिं राही निष्काम"
"छत्र शिरावर तुझ्या पित्याचें
पाळच वत्सा, वचन तयांचें
सार्थक कर त्या वृद्धपणाचें
राज्य नीतिनें करुन वाढवी रघुवंशाचें नाम"
"काय सांगणे तुज धीमंता,
उदारधी तूं सर्व जाणता
पुत्रवियोगिनि माझी माता
तुझ्या वर्तनें तिला भासवी भरत तोच श्रीराम"
बोलत बोलत ते गहिंवरले
कमलनयनिं त्या आसूं भरलें
करुण दृश्य तें अजुन न सरले -
गंगातीरीं-सौमित्रीसह-उभे जानकी-राम
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.