आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.
आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.
गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
MP3 player is mobile compatible (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
काय ऐकतें ? काय पाहतें ? काय अवस्था ही ?
रघुवरा, बोलत कां नाहीं ?
जायेआधीं मरण पतीचें, हें कैसें घडलें ?
दैवच अंती तुटुन खड्गसे माझ्यावर पडलें
पुण्यहीन का ठरल्या लोकीं कौसल्यामाई ?
ज्योतिषांचीं ग्रहगणितें का सर्वथैव चुकलीं ?
अभागिनी ही कशी अचानक सर्वस्वा मुकली ?
धुळींत निजले पुरुषोत्तम का या मूढेपायीं ?
ओळखितें मी कमलनेत्र हे, ओळखितें श्रवणें
सरे न का ही झोंप राघवा, दीनेच्या रुदनें ?
गतीहीन कां झाली सृष्टी, सुन्न दिशा दाही ?
सुवर्णधनु हें ओळखिलें पण कुठें महाबाहु ?
श्यामवर्ण ती मूर्त पुन्हां मी कुठें कधीं पाहूं ?
नयन जाहले रडुन कोरडे, अंगाची लाही
विवाहसमयीं शपथ दिली ती विसरलांत सदया !
पुशिल्यावांचुन स्वर्गी गेला सोडुनिया जाया
ऐकलेंत का ? - जनकनंदिनी आर्त तुम्हां बाही
रघुकुलतिलका, तुम्ही भेंटला पितरांना स्वर्गी
परक्या हातीं सजीव उरली अर्धांगी मार्गी
रघुकुलजातें शोभुन दिसली रीत तरी का ही ?
अथांग सागर जिंकुन आला कशास मजसाठीं ?
काय जन्मलें कुलनाशिनि मी धरणींच्या पोटीं ?
जनकें केले यज्ञ, तयांची काय सांगता ही ?
हे लंकेशा, ज्या शस्त्रानें मारविलें नाथां
घाव तयाचा घाल सत्वरीं सीतेच्या माथां
रामामागें तरी जाउं दे अंतीं वैदेही
गदिमा गौरव | Special Quotes
पु.ल.देशपांडे:
महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.