आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.
आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.
गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
सुग्रीवा, हें साहस असलें
भूपतीस तुज मुळिं न शोभलें
अटीतटीचा अवघड हा क्षण
मायावी तो कपटी रावण
भिडलासी त्या अवचित जाउन
काय घडें तें नाहीं कळलें
विचारल्याविण मला, बिभिषणा
सांगितल्याविण मला, लक्ष्मणा
कुणा न देतां पुसट कल्पना
उड्डणा तव धाडस धजलें
ज्ञात मला तव अपार शक्ति
माझ्यावरची अलोट भक्ति
तरीहि नव्हतें योग्य संप्रति
अनपेक्षित हें कांहीं घडले
द्वंद्वे जर तुज वधणें रावण
वृथा जमविलीं सैन्यें आपण
कशास यूथप वा वानरगण
व्यर्थच का हे ऋक्ष मिळविले ?
काय सांगुं तुज, शत्रुदमना
नृप नोळखती रणीं भावना
नंतर विक्रम, प्रथम योजना
अविचारें जय कुणा लाभले ?
तू पौलस्त्यासवें झुंजता
क्षीण क्षण जर एकच येता
सन्मित्राते राघव मुकता
तव सैनिक मग असते खचले
काय लाभतें या द्वंद्वानें ?
फुगता रावण लव विजयानें
लढते राक्षस उन्मादानें
वानर असते परतच फिरले
दशकंठचि मग विजयी होता
मैथिलीस मग कुठुन मुक्तता ?
व्यर्थच ठरतीं वचनें शपथा
कुणी राक्षसां असतें वधिलें ?
जा सत्वर जा, जमवी सेना
करी रणज्ञा, सुयोग्य रचना
आप्त-सैन्यासह वधूं रावणा
व्यर्थ न दवडी शौर्य आपुलें
गदिमा गौरव | Special Quotes
पं.महादेवशास्त्री जोशी
गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे
संयुक्तिक ठरेल..
"गीतरामायण" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे!. आजच डाऊनलोड करा
GeetRamayan application now available on android phones,now enjoy geetramayan songs in audio and text on your mobile,for more details click on following link Download Link