जोगिया हा गदिमांचा पहिला काव्यसंग्रह,प्रस्तावनेत गदिमा म्हणतात जीवनव्यवसाय म्हणून लेखणीशी अनेकदा बेईमानी करण्याचा प्रसंग मजवर आला-येतो आहे.या संग्रहातील कविता ही मात्र व्रतस्थपणे केलेली काव्यनिर्मिती आहे.या संग्रहाला जोगिया असे नाव म्हणूनच द्यावेसे वाटले.
गदिमांच्या जोगिया संग्रहातील निवडक १६ कवितांना चाली लावल्या आहेत सुरेशदा देवळे यांनी,गायक आहेत श्रीधर फडके,उत्तरा केळकर,रविंद्र साठे,चारुदत्त आफळे,ज्ञानदा परांजपे.गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी या अल्बमची निर्मिती केली आहे.
MP3 player is mobile compatible (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहिले देठ, लवंगा, साली.
झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी अजुनी नाही नीज ?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलुनी तू दार दडपिले पाठी.
हळुवार नखलिशी पुनः मुलायम पान
निरखिसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसी काय ते ? गौर नितळ तव कंठी
स्वरवेल थरथरे फूल उमलते ओठी.
साधता विड्याचा घाट, उमटली तान
वर लवंग ठसता होसी कशी बेभान ?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने
"का नीर लोचनी आज तुझ्या ग मैने ?"
त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भाव स्वरांचा योग
घमघमे, जोगिया दंवात भिजुनी गाता
पाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा.
"मी देह विकुनिया मागुन घेते मोल
जगविते प्राण हे ओपुनिया 'अनमोल'
रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र देही तिळाएवढी जागा.
शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सांवळा तरुण तो खराच ग वनमाली
लाविते पान तो निघून गेला खाली.
अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेहि नाहि मी मंगल त्याचे नाव
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
"मम प्रीती आहे जडली तुजवर राणी !"
नीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळा तिथे हा इष्का गणितो प्यार
हासून म्हणाल्ये, "दाम वाढवा थोडा"
या पुन्हा, पान घ्या " निघून गेला वेडा !
राहिले चुन्याचे बोट, थांबला हात
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला ?
तो हाच दिवस हा, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्ये बसले परि रतिक्लांत
वळुनी न पाहता कापित अंधाराला
तो तारा तुटतो- तसा खालती गेला.
हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान
ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे.
गदिमा गौरव | Special Quotes
बा.भ.बोरकर
वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील
यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.