पण मागे रेंगाळलेल्या काही चुकार कीरणांमुळे सार्या परिसरावरच फिकट गुलाबी रंगाचा मुलामा चढलेला... हवेत अर्थातच सुखद
गारवा पसरलेला. रंकाळ्याच्या एरवी शांत असणार्या पाण्यात काही लाटा उमटत होत्या. किनार्यावर त्या थडकताच अंगावर
उडणारे
तुषार मनाला सुखवून जात होते. दूरवर अंधुक प्रकाशात धूसर दिसणारी संध्यामठाची देखणी इमारत अधिकच सुंदर दिसत
होती. आणि या भारलेल्या वातावरणात दोन तरुण झपाझपा पावले टाकीत चालताना भावी आयुष्याचे मनोरे रचत होते...
एवढ्यात त्या दोघांचे लक्ष समोरून आपले यौवन सावरीत येणार्या एका सावळ्या पण अतिशय देखण्या अशा तरुणीकडे गेले.ती आपल्याच तंद्रीत स्वतःशीच लाजत त्या दोघांकडे केवळ एक चोरटा कटाक्ष टाकत पुढे निघून गेली. योगायोगाने तेवढ्यात आकाशातही झपकन वीज चमकून गेली. त्या दोघांपैकी काहीशा उंच आणि स्थूल तरुणाने दुसर्याकडे पाहून केवळ एक स्मित करून म्हटले,
हा घे, तुझ्या नव्या भावगीताचा मुखडा...
सावळाच रंग तुझा
पावसाळी नभापरि
आणि नजरेत तुझ्या
वीज खेळते नाचरी
ते दोन तरुण म्हणजे पुढे मराठी चित्रपट आणि भावगीत सृष्टीत ‘अद्वैत’ठरलेले दिग्गज ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडकेच होते.
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.