आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.
आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.
गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
MP3 player is mobile compatible (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
मुद्रिका अचुक मी ओळखिली ही त्यांची
मज सांग अवस्था दूता, रघुनाथांची
हातांत धनू तें, अक्षय भाता पृष्ठीं
विरहांत काय ते राघव झाले कष्टी ?
कां श्यामल वलयें नयनतळीं चिंतांचीं ?
बसलेत काय ते लावुन कर कर्मातें ?
विसरलेत काय ते दुःखें निजधर्मातें ?
करितात अजुन ना कर्तव्यें नृपतीचीं ?
सोडिले नाहिं ना अजुन तयांनीं धीरा ?
का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा ?
साह्यार्थ असति ना सैन्यें सन्मित्रांची ?
इच्छिती विजय ना त्यांचा अवघे राजे ?
का लोकप्रीतिला मुकले प्रियकर माझे ?
विसरले थोरवी काय प्रभू यत्नांची ?
का मलाच विसरुन गेले माझे स्वामी ?
मी दैवगतीने पिचतां परक्या धामीं
का स्मृती तयांना छळिते या सीतेची ?
करतील स्वयें ना नाथ मुक्तता माझी ?
धाडील भरत ना सैन्य, पदाती, वाजी ?
कळतसे त्यांस का वार्ता रघुनगरीची ?
का विपत्कालिं ये मोह तयांच्या चित्तीं ?
पुसटली नाहिं ना सीतेवरची प्रीती ?
करतील मुक्तता कधिं ते वैदेहीची ?
त्या स्वर्णघडीची होइन का मी साक्षी ?
कधिं रामबाण का घुसेल रावणवक्षीं ?
वळतील पाउलें कधीं इथें नाथांचीं ?
जोंवरी तयांचें कुशल ऐकतें कानीं
तोंवरी सजिव मी असेन तैशा स्थानीं
जन्मांत कधीं का होइल भेट तयांची ?
गदिमा गौरव | Special Quotes
पं.महादेवशास्त्री जोशी
गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे
संयुक्तिक ठरेल..