गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.
साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
तुला चिंतिते सुदीर्घ आयु
पुण्यसलीला सरिता सरयु
पुलकित पृथ्वी, पुलकित वायु
आज अहल्येपुरी जाहला नगरीचा उद्धार
शिवचापासम विरह भंगला
स्वयंवरासम समय रंगला
अधिर अयोध्यापुरी मंगला
सानंदाश्रू तुला अर्पिते दृढ प्रीतीचे हार
तव दृष्टीच्या पावन स्पर्षे
आज मांडिला उत्सव हर्षे
मनें विसरलीं चौदा वर्षे
सुसज्ज आहे तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार
तुझ्या मस्तकी जलें शिंपतां
सप्त नद्यांना मिळो तीर्थता
अभिषिक्ता तुज जाणिव देतां
मुनिवचनांचा पुन्हां होउं दे अर्थासह उच्चार
पितृकामना पुरी होउं दे
रामराज्य या पुरीं येउं दे
तें कौसल्या माय पाहुं दे
राज्ञीसह तूं परंपरेनें भोग तुझा अधिकार
प्रजाजनीं जें रचिलें स्वप्नीं
मूर्त दिसे तें स्वप्न लोचनीं
राजा राघव, सीता राज्ञी
चतुर्वेदसे लोक पूजिती रघुकुलदीपक चार
रामराज्य या असतां भूवर
कलंक केवल चंद्रकलेवर
कज्जल-रेखित स्त्रीनयनांवर
विचारांतलें सत्य आणतिल अयोध्येंत आचार
समयिं वर्षतिल मेघ धरेवर
सत्यशालिनी धरा निरंतर
सेवारत जन, स्वधर्मतत्पर
"शांतिः शांतिः" मुनी वांच्छिती, ती घेवो आकार
गदिमा गौरव | Special Quotes
पं.महादेवशास्त्री जोशी
गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे
संयुक्तिक ठरेल..