गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.
साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
MP3 player is mobile compatible (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
मुद्रिका अचुक मी ओळखिली ही त्यांची
मज सांग अवस्था दूता, रघुनाथांची
हातांत धनू तें, अक्षय भाता पृष्ठीं
विरहांत काय ते राघव झाले कष्टी ?
कां श्यामल वलयें नयनतळीं चिंतांचीं ?
बसलेत काय ते लावुन कर कर्मातें ?
विसरलेत काय ते दुःखें निजधर्मातें ?
करितात अजुन ना कर्तव्यें नृपतीचीं ?
सोडिले नाहिं ना अजुन तयांनीं धीरा ?
का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा ?
साह्यार्थ असति ना सैन्यें सन्मित्रांची ?
इच्छिती विजय ना त्यांचा अवघे राजे ?
का लोकप्रीतिला मुकले प्रियकर माझे ?
विसरले थोरवी काय प्रभू यत्नांची ?
का मलाच विसरुन गेले माझे स्वामी ?
मी दैवगतीने पिचतां परक्या धामीं
का स्मृती तयांना छळिते या सीतेची ?
करतील स्वयें ना नाथ मुक्तता माझी ?
धाडील भरत ना सैन्य, पदाती, वाजी ?
कळतसे त्यांस का वार्ता रघुनगरीची ?
का विपत्कालिं ये मोह तयांच्या चित्तीं ?
पुसटली नाहिं ना सीतेवरची प्रीती ?
करतील मुक्तता कधिं ते वैदेहीची ?
त्या स्वर्णघडीची होइन का मी साक्षी ?
कधिं रामबाण का घुसेल रावणवक्षीं ?
वळतील पाउलें कधीं इथें नाथांचीं ?
जोंवरी तयांचें कुशल ऐकतें कानीं
तोंवरी सजिव मी असेन तैशा स्थानीं
जन्मांत कधीं का होइल भेट तयांची ?
गदिमा गौरव | Special Quotes
बा.भ.बोरकर
वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील
यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.