आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.
आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.
गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
MP3 player is mobile compatible (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
साक्षीस व्योम, पृथ्वी, साक्षीस अग्निज्वाला
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला
रामा, तुझ्यापरी मी वनवास भोगताहें
हनुमन्मुखें तुला तें साद्यंत ज्ञात आहे
दुःखीच साह्य होतो दुःखांत दुःखिताला
बंधूच होय वैरी, तुज काय सांगुं आर्या !
नेई हरून वाली माझी सुशील भार्या
वालीस राघवा, त्या तूं धाड रौरवाला
बाहूंत राहुच्या मी निस्तेज अंशुमाली
गतराज्य-लाभ होतां होईन शक्तिशाली
माझेंच शौर्य सांगूं माझ्या मुखें कशाला ?
होतां फिरून माझें तें सैन्य वानरांचे
होतील लाख शत्रू त्या दुष्ट रावणाचे
ते लंघतील सिंधू, खणतील शैलमाला
ते शोधितील सीता, संदेह यात नाहीं
निष्ठा प्लवंगमांची तूं लोचनेंच पाही
होतील सिद्ध सारे सर्वस्व अर्पिण्याला
झालेच सख्य रामा, देतों करीं करातें
आतां कशास भ्यावे कोणा भयंकरातें ?
तूं सिद्ध हो क्षमेंद्रा, वालीस मारण्याला
घालीन पालथी मी सारी धरा नृपाला
रामासमीप अंतीं आणीन जानकीला
धाडीन स्वर्ग-लोकीं येतील आड त्याला
हनुमान, नील, ऐका, मंत्री तुम्ही न माझे
सुग्रीव एक मंत्री, हे रामचंद्र राजे
आज्ञा प्रमाण यांची आतां मला, तुम्हांला
गदिमा गौरव | Special Quotes
पु.ल.देशपांडे:
महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.