गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.
साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
वंदनास योग्य मी पराविया पतिव्रता
पुण्य जोड राक्षसा झणीं करुन मुक्तता
लाज राख नारिची वीर तूं जरी खरा
नृपति-पाप पाहतें, अनयनित्य साहतें
राष्ट्र तें जगावरी नाममात्र राहतें
काय आग लाविशी तुझ्या करें तुझ्या पुरा ?
जिथें तिथें दिसे मला लोकनाथ राम तो
शयनिं ये उशातळीं रामहस्तवाम तो
चिंतनांत पूजिते त्याच मी धनुर्धरा
योग्य एक त्यास मी, योग्य ना दुजा कुणा
परत धाड रे मला प्रियासमीप रावणा !
शरण त्यांस रक्षुनी राम देइ आसरा
सख्य जोड त्यासवें, हो कृतार्थ जीवनीं
नित्यशुद्ध जानकी राघवास अर्पुनी
ना तरी मृतीच ये चालुनी तुझ्या घरा
इंद्रवज्रही कधीं चुकेल घाव घालितां
क्षणहि आयु ना तुझे रामचंद्र कोपतां
रामबाणवृष्टि ती प्रळयसी भयंकरा
ठाकतां तुझ्यापुढें वीर युद्धकाम तो
ठेवणार वंश ना असा समर्थ राम तो
अधम काममूढ तूं, विचार हा करी जरा
बघेन रामबाण मी निडर या तुझ्या उरीं
कंक पंख पाठिशीं, नामचिन्ह ज्यावरी
भारमुक्त होउं दे एकदां वसुंधरा
गदिमा गौरव | Special Quotes
बा.भ.बोरकर
वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील
यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.