आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.
आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.
गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
MP3 player is mobile compatible (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
विरूप झाली शूर्पणखा, ही दाशरथीची कृति
सूड घे त्याचा लंकापति
कसलें करिसी राज्य रावणा, कसलें जनपालन ?
श्रीरामानें पूर्ण जिंकिले तुझें दंडका-वन
सत्तांधा, तुज नाहीं तरिही कर्तव्याची स्मृति
वीस लोचनें उघडुनि बघ या शूर्पणखेची दशा
श्रीरामाच्या पराक्रमानें कंपित दाही दिशा
तुझे गुप्तचर येउन नच का वार्ता सांगति ?
जनस्थानिं त्या कहर उडाला, मेले खरदूषण
सहस्र चौदा राक्षस मेले हें का तुज भूषण ?
देवासम तो सुपूज्य ठरला जनस्थानिंचा यति
तुझ्याच राज्यीं तुझ्याहुनीही पूज्य जाहला नर
सचिवासंगे बैस येथ तूं स्वस्थ जोडुनी कर
जाळुन टाकिल तव सिंहासन उद्यां तयाची द्युति
सुदर्शनासह व्यर्थ झेलले छातीवर तूं शर
व्यर्थ मर्दिले देव, उचलिले सामर्थ्ये डोंगर
तूंच काय तो धर्मोच्छेदक अजिंक्य सेनापति ?
तूंच काय रे कुबेर जिंकुन पुष्पक नेलें घरीं ?
तूंच काय तो, वारिली ज्यानें तक्षकनृपसुंदरी ?
तूंच काय तो भय मृत्यूचें लव नाहीं ज्याप्रति ?
ऐक सांगतें पुन्हां तुला त्या श्रीरामाची कथा
बाण मारता करांत त्याच्या चमके विद्युल्लता
शस्त्रनिपुणता बघून त्याची गुंग होतस मति
तो रूपानें रेखीव, श्यामल, भूमीवरती स्मर
त्याच्यासंगे जनककन्यका रतीहुनी सुंदर
तुलाच साजुन दिसेल ऐसी मोहक ती युवति
तिला पळवुनी घेउन यावें तुजसाठीं सत्वर
याचसाठिं मी गेलें होतें त्यांच्या कुटिरावर
श्रवणनासिका तोडुन त्यांनी विटंबिलें मज किती !
जा, सत्वर जा, ठार मार ते बंधू दोघेजण
हसली मज ती जनककन्यका, येइ तिज घेउन
माझ्यासम ते तव सत्तेची विटंबिती आकृति
गदिमा गौरव | Special Quotes
लेखक पु.भा.भावे:
वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.